नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंड संघात टी-२० मालिकेतील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झाला. या सामन्यात इंग्लंडने ८ गडी राखून भारताचा पराभव केला. त्यामुळे इंग्लंडने पाच सामन्याच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली. तत्पुर्वी भारतीय संघात रोहित शर्माला स्थान न दिल्याने सर्वजन अचंबित झाले होते.
कारण सर्वांना वाटत होते की, या सामन्याची सलामी जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल असणार. परंतु सामन्याची नाणेफेक झाल्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघ घोषित केला. ज्यामध्ये रोहित शर्माचा समावेश नव्हता. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. हा निर्णय घेण्यामागचे कारण विराट कोहलीने सामना संपल्यानंतर सांगितले.
सामना संपल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, “आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती. कारण दुसऱ्या डावात या मैदानावर दव पडते.त्यामुळे चेंडूवर निर्माण करता येणार नाही .यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे अवघड जाते. आता आम्हाला सामन्यात टिकून राहावे लागणार आहे आणि इंग्लंडला कोणत्याही प्रकारे रोखायला हवे. ”
आता आम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागली तर कशा प्रकारे डाव पुढे घेऊन जायचा? मैदानावर ओलावा असताना कशाप्रकारे गोलंदाजी करावे लागेल? या बाबतची रणनिती आखत आहोत. याचा फायदा आम्हाला टी-२० विश्वचषकात होणार आहे. त्यामुळे पुढील काही महिने संघासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. यामुळेच आम्ही रोहितला सुरुवातीच्या काही सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे,”असे विराट कोहलीने सांगितले.
पहिल्या टी-२० सामन्याच्या अगोदर एक दिवस विराट कोहलीने स्पष्ट संकेत दिले होते .तो आभासी पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, “हे काहीसे सोपे आहे. वरच्या फळीत आमच्यासाठी राहुल आणि रोहितने चांगली कामगिरी केली आहे. ते दोघे डावाची सुरुवात करतील. तसेच जर रोहितला विश्रांती दिली किंवा राहुलला एखादी दुखापत झाली, तर शिखर धवन तिसरा सलामीवीर म्हणून पर्याय असेल.”