नवी दिल्ली – भारतामध्ये कोविड-19 ची दुसरी लाट येण्याची शक्यता नाही. जरी अशी लाट आलीच तरी ती पहिल्या लाटेइतकी तीव्र असणार नाही, असे तज्ञांनी म्हटले आहे. देशातील दैनंदिन करोनाबाधित आणि दैनंदिन मृत्यूदर कमी होत असला तरी करोनाबाधितांच्या एकूण संख्येने एक कोटींचा टप्पा ओलंडल्याच्या पार्श्वभुमीवर तज्ञांचे हे मत पुढे आले आहे.
भारतात सप्टेंबरच्या मध्यात करोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होता. मात्र त्यानंतर हा वेग मंदावला आहे, असे प्रसिद्ध विषाणूतज्ञ डॉ. शाहिद जमिल यांनी म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये दररोज 93 हजार रुग्ण सापडत होते. मात्र आता हे प्रमाण दररोज 25 हजारांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे सर्वात वाईट स्थिती येऊन गेली आहे.
मात्र नोव्हेंबरच्या अखेरच्या काळात ज्या प्रमाणे रुग्णसंख्येत अचानक थोडी वाढ झाली, तशी थोडी वाढ झाल्याचे दिसू शकते, असे डॉ. जमील म्हणाले. दुसऱ्या राष्ट्रीय सिरोसर्व्हेनुसार देशातील रुग्ण संख्या 16 पट अधिक असायला हवी. त्या निकषानुसार देशातील रुग्णसंख्या सध्या 160 दशलक्ष असायला हवी होती. देशातील एकूण बाधितांची संख्या 300 ते 400 दशलक्ष असू शकते. मात्र देशातील बहुसंख्य लोकसंख्येला हा संसर्ग होण्यापासून वाचवले गेले आहे असेच म्हणावे लागेल.
पहिल्या लाटेत संसर्गाचा वेग जितका होता, तितका दुसऱ्यावेळी असणार नाही आणि त्याची सर्वोच्च मर्यादाही इतकी असणार नाही, असे प्रसिद्ध वैद्यकीय संशोधक डॉ. कांग यांनी म्हटले आहे.
समाजामध्ये सामुदायिक प्रतिकारक्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा चिंता करायला लागेल, असे आपल्याला वाटत नाही.
मात्र पुरेशा संरक्षणाची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तरच जसा पहिल्या लाटेच्यावेळी संसर्ग वेगाने पसरला होता, तसा पसरणार नाही, असेही डॉ. कांग म्हणाल्या. ही समस्या “हर्ड इम्युनिटी’ (सामुदायिक प्रतिकारशक्ती) ने दूर गेलेली नाही आणि जाणारही नाही. मात्र ज्या प्रमाणे पश्चिमेकडे दुसरी लाट दिसली, तशी आपल्याकडेही दिसेल असे वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या.
भारतात अजूनही ज्यांना कोविड -19 चा संसर्ग झालेला नाही, अशी 30 ते 40 टक्के लोकसंख्या आहे. असे प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट डॉ. के. अग्रवाल यांनी सांगितले. कोविड-19 चा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या भारत, अर्जेंटिना आणि पोलंडसारख्या 15 देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आलेली आढळलेले नाही. सर्व शक्यता गृहित धरल्या तर भारतात दुसरी लाट येणार नाही. विषाणूचे नवीन स्वरुपांनीच ही दुसरी लाट येऊ शकते.
या नवीन स्वरुपांपैकी दोन प्रकार आढळले आहेत. त्यातील एक इंग्लंडच्या दक्षिणेला आणि दुसरा दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे. जर भारतात याच महिन्यात लसीकरण सुरू केले आणि 30 कोटी लोकांना लसीकरण केले गेले, तर 25 मार्च पर्यंत आपण या रोगाला आटोक्यात आणू शकू, असेही डॉ. अग्रवाल म्हणाले.
जर दुसरी लाट आलीच तर ती विषाणूच्या वेगळ्या स्वरुपामुळे पसरेल. त्यामुळे जास्त रुग्णबाधित होतील. पण मृत्यूदर कमी असेल. सामूदायिक प्रतिकारशक्तीमुळेच ही लाट आटोक्यात येईल, असेही ते म्हणाले.
काही राज्यांमध्ये करोनाबाधितांचा प्रादुर्भाव घटतो आहे. तर अन्य राज्यांमध्ये त्यात चढउतार आहेत, असे “इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे “एपिडेमिओलॉजी अँड कम्युनिकेशनल डिसिजेस’ विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा म्हणाले.