नवी दिल्ली – करोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी शेजारी बांगलादेशला भारत तीन कोटी डोस देणार आहे. भारत, बांगलादेश, सीरम इन्स्टिट्यूट आणि बेक्सिम्को फर्मास्युटिकल्स यांच्यात याबाबत समझोता करार करण्यात आला.
ऍस्ट्राझिंका लसीचे तीन कोटी डोस खरेदी करण्यासाठी बांगलदेशने सीरमसोबत गुरुवारी करार केला होता. करोनाविरोधातील युद्धात सर्व देशांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच म्हटले होते. त्याचबरोबर शेजारी देशांना मदत करून त्यांची काळजी घेण्याची भूमिकाही पंतप्रधानांनी व्यक्त केली होती.
भारताचे बांगलादेशमधील उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी यांनी ट्विट केले. दोन्ही देशांतील संबंधांचा नवा अध्याय लिहिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, सीरम इन्स्टिट्यूट आणि बेक्सिम्को फर्मास्युटिकल्स यांच्यातील समझोता करारामुळे दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत होतील, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
ज्यावेळी ही लस तयार होईल त्यावेळी पहिल्या टप्प्यात सीरम इन्स्टिट्यूट आम्हाला तीन कोटी डोस देईल, असे बांगलादशचे आरोग्यमंत्री झहीद मलेक्यू यांनी सांगितले. बांगलादेशची औषध निर्मिती करणारी कंपनी बेक्सिम्को फर्मास्युटिकल्स दर महिन्याला 50 लाख डोस खरेदी करेल.
भारतात तयार होणाऱ्या लसीमध्ये भागीदारी करण्यास बांगलादेश शिवाय म्यानमार, कतार, भूतान, स्वित्झर्लंड, बहारीन, ऑस्ट्रिया आणि दक्षिण कोरोया या देशांनीही स्वारस्य दाखवले आहे.