नवी दिल्ली – देशांत गेल्या 24 तासांत 13 हजार 993 जणांना बाधा झाली. तर करोनाशी संबंधित आजाराने 101 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. सुमारे 23 दिवसांनी करोना बाधितांनी 14 हजाराचा टप्पा गाठला आहे.
यापुर्वी 29 जानेवारीला 18 हजार 885 बाधितांची नोंद करण्यात आली. देशातील सक्रिय बाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी अधिक होती. सक्रिय बाधितांची संख्या शुक्रवारी एक लाख 39 हजार 542 होती, ती शनिवारी एक लाख 43 हजार 127 वर जाऊन पोहोचली. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 1.27 टक्के आहे.
जगात करोनाचा तडाखा बसलेल्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात एकूण एक कोटी नऊ लाख 77 हजार 387 बाधित आहेत. तर एक लाख 56 हजार 212 जणांनी करोनामुळे प्राण गमावले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या 101 बळीमंध्ये 44 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. 15 केरळमध्ये तर पंजाबात आठ जण मरण पावले आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत 51 हजार 713 बळी गेले आहेत. तमिळनाडूत 12 हजार 451 तर कर्नाटकांत 12 हजार 287 बळी गेले आहेत. दिल्लीतील मृतांची संख्या 10 हजार 897 असून प. बंगालमध्ये 10 हजार 242 तर उत्तर प्रदेशात आठ हजार 712 मरण पावले आहेत.
शुक्रवारी एका दिवसांत 10 हजार 307 जण बरे झाले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या एक कोटी सहा लाख 78 हजार 48 झाली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण 97. 27 आहे. तर मरण पावणाऱ्यांचे प्रमाण 1.42 टक्के आहे.
कोटीमोलाचे लसीकरण –
करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम 16 जानेवारीला सुरू करण्यात आली. त्यात आतापर्यंत एक कोटी सात लाख 15 हजार 204 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण केलेल्यांमध्ये 62 लाख 95 हजार 903 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर सात लाख 56 हजार 942 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. करोनाच्या लढ्यातील 33 लाख 97 हजार 97 आघाडीच्या करोना योध्यांनी लस घेतली आहे.