नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी एक बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक तसेच पक्षाच्या विविध समस्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते. तसेच केंद्राच्या अध्यादेशाविरोधात कॉंग्रेसने केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर या बैठकीत चर्चा झाली.
केजरीवालांना समर्थन देण्यावरून कॉंग्रेसमध्ये फूट पडल्याचे बैठकीला उपस्थित नेत्यांनी सांगितले. मात्र दिल्ली-पंजाबचे नेत्यांनी खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. तर अंतिम निर्णय हायकमांडवर सोडण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. केंद्राच्या अध्यादेशाविरोधात कॉंग्रेसने केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर या बैठकीत चर्चा झाली.
तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्यामधील वादावर तोडगा काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पक्षातील वादानंतर या दोन्ही नेत्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आता त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे खर्गेंनी स्पष्ट केले.
दिल्लीत “आप’सोबत आघाडी करण्याची गरज नाही, असा आग्रह दिल्लीच्या नेत्यांनी बैठकीत धरला. तसेच दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पोस्टिंगबाबत केंद्राच्या अध्यादेशाविरोधात “आप’ला पाठिंबा देण्यासही त्यांनी नकार दिला. पण याविषयीचा कोणताही अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी हायकमांडला दिला.
केजरीवालांनी अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचा पाठिंबा मागितला होता. खर्गे आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या अध्यादेशाला विरोध दर्शवताना केजरीवालांना पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले होते. पण दिल्ली व पंजाब कॉंग्रेसने पक्ष हायकमांडच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता. या बैठकीला कॉंग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
आजच खर्गे, केसी वेणुगोपाल व राहुल गांधी यांनी कॉंग्रेस मुख्यालयात मध्य प्रदेशातील पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. पक्षातील वादानंतर या दोन्ही राज्यांच्या नेत्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आता त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे खर्गेंनी स्पष्ट केले.