उदयपूर – कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी आगामी 2-3 दिवसात एक “टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येईल. तसेच राजकीय मुद्यांसंदर्भात सल्लागार समितीही स्थापन करण्यात येईल, असे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज स्पष्ट केले. पक्षाला सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे, या जी-23 गटाच्या असंतुष्ट नेत्यांच्या मागणीचा विचार करून संघटनात्मक फेरबदलांचे संकेत सोनिया गांधींनी दिले आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय चिंतन शिबीराच्या समारोप प्रसंगी सोनिया गांधींनी पक्षातील नेत्यांनी मांडलेल्या विचारांबद्दल आणि सूचनांबद्दल समाधान व्यक्त केले.
आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत. हा आपला “नव-संकल्प’ आहे. कॉंग्रेसमध्ये नवीन पहाट होते आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. 2014 पासून सतत पराभव स्विकाराव्या लागलेल्या कॉंग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
अंतर्गत सुधारणांसाठी टास्क फोर्स स्थापन केली जाईल. या सुधारणा 2024 च्या लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केल्या जातील. संघटनेतील रचना, पदांवरील नियुक्त्यांसाठीचे नियम, संवाद आणि प्रसिद्धी, संपर्क, अर्थसहाय्य आणि निवडणुक नियोजन या सर्व बाजूंचा त्यासाठी विचार केला जाईल, असे सोनिया गांधींनी समारोपाच्यावेळी बोलताना सांगितले.
राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मुद्यांवर आणि पक्षीासमोरील आव्हानांबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठकदेखील नियमितपणे होईल. टास्क फोर्स मात्र निर्णय घेणारा गट नसेल. कॉंग्रेसमधील अनुभवी नेते मार्गदर्शन करण्याचे काम करतील, असेही सोनिया गांधींनी स्पष्ट केले. या गटाची रचना 2-3 दिवसातच निश्चित केली जाणार आहे.
या वर्षी 2 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय पातळीवर “कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो’ ही यात्रा कॉंग्रेस सुरू करणार आहे आणि प्रत्येकजण त्यात सहभागी होईल, अशी घोषणाही गांधींनी केली. जन जागरण यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला 15 जूनपासून सुरुवात होईल. त्यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारी, महागाई सारख्या मुद्यांवर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.