मुंबई – राज्याच्या हितासाठी मी अहंकारी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला. मेट्रो कारशेडच्या जागेवरून भाजपा आणि ठाकरे सरकारमध्ये जोरदार शाब्दिक युध्द रंगले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, आरे कारशेड मेट्रो 3 साठी 30 हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी पाच हेक्टर जागेमध्ये घनदाट जंगल होते. उर्वरित 25 हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यामुळे जंगल कापून ही जागा वाढवावी लागली असती. म्हणून कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवला होता, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मेट्रोच्या पहिल्या प्रकल्पात स्टेंबलिंग लाईनचा प्रस्ताव नव्हता. स्टेंबलिंग लाईन ही आवश्यक आहे. ती नसल्याचे पाहून मला धक्काच बसला. आपण पर्यावरण वाचवण्यसाठी आरे कारशेडची जागा बदलल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्तीही आपण वाढवली. कांजूरमार्गला असणारी 40 हेक्टर जागा जागा ओसाड आहे. तेथे मेट्रोच्या 3,4 आणि 6 या मार्गिकेंच्या कारशेड करता आल्या असत्या. जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होती. तिकडे अन्य लाईनसाठीही कारशेड करता येईल. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?, असा सवाल करत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
आरेमध्ये कारशेडचा वापर केवळ पुढीला पाच वर्षांसाठी होणार होता. परंतु काजूरमार्गमध्ये ती केल्यास पुढील 40 वर्षांसाठी त्याचा वापर करता येईल. तेथून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे. आपल्या विरोधात केंद्र सरकार न्यायालयात गेले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्रित बसून हा वाद सोडवणे आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.