लडाख – भारताशी विनाकारण वाद उकरून काढत डोळे वटारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला उपरती यावी अशी बातमी आहे. त्याचे कारण म्हणजे देशाच्या सर्व सीमांवर अत्यंत प्रतिकूल स्थितीत उभे राहून देशाचे रक्षण करण्याचे काम भारतीय लष्कराचे जवान गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत चिकाटीने आणि निष्ठेने पार पाडत आहे. मात्र भारताकडे वक्रदृष्टी करून अगाउपणा करणाऱ्या चीनी सैन्याला ही खडतर परिस्थिती छेपत नसल्याचे दिसते आहे.
त्याचे कारण म्हणजे पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या चिनी सैनिकांची प्रकृती थंडीमुळे गंभीर बनत चालली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीने थंडीमुळे 90 टक्के सैनिकांना माघारी बोलवले आहे. मागील वर्षी एप्रिल-मेपासून चीनने पूर्व लडाखमध्ये 50 हजाराहून अधिक सैन्याला भारतीय सीमेजवळ तैनात केले आहे.
सूत्रांनी एएनआयला सांगितले की, गेल्या एक वर्षापासून तेथे उपस्थित असलेल्या सैनिकांची जागा घेण्यासाठी चीनने दुसऱ्या सैनिकांना बोलावलं आहे. सुमारे 90 टक्के सैनिक माघारी बोलवण्यात आले आहेत. थंडीमुळे या भागात भीषण परिस्थितीत तैनात केलेल्या चिनी सैन्यांवर मोठा परिणाम झाला आहे. सूत्रांनी सांगितले की, पॅंगॉंग लेक क्षेत्रात तैनात चिनी सैनिकांची हालचाल प्रतिबंधित झाली होती.
रोज सैनिकांना हलवण्यात येत होते.
भारतीय सैन्य दोन वर्षासाठी आपल्या सैनिकांना या उंच भागात तैनात करते आणि दर वर्षी सुमारे 40-50 टक्के सैनिक फिरवले जातात. अशा परिस्थितीत आयटीबीपी कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ कधीकधी दोन वर्षांपेक्षा जास्त असतो.
मागील वर्षी एप्रिल-मेपासून भारत आणि चीनने पूर्व लडाख आणि नियंत्रण रेषेच्या जवळ एकमेकांच्या समोर प्रचंड सैन्य तैनात केले होते. या वर्षाच्या सुरूवातीस, दोन्ही देशांनी पॅंगॉंग लेक क्षेत्रात आपले तैनात सैन्य मागे घेण्याचे आणि तेथील गस्त थांबविण्याचे मान्य केले होते. तरी देखील सैनिक जवळच्या भागात आहेत.