बीजिंग – चीनच्या कथित आर्थिक सामर्थ्याच्या आणि मॅन्युफॅक्चरींग हब असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरवल्या जातात. मात्र पायाभूत सुविधांच्या संदर्भात चीन अमेरिकेला शह देउ शकेल किंबहुना अमेरिकेच्या जवळपास तरी जाउ शकेल का, अशी शंका उत्पन्न करणाऱ्या बातम्या ते देशासंदर्भात ऐकायला येत असतात. आताही विजेच्या टंचाईच्या संदर्भात अशीच एक बातमी त्या देशातून आली आहे.
विजेची मागणी वाढत असली तरी ही मागणी पूर्ण करण्यासाठी कोळश्याचा साठा उपलब्ध नसल्यामुळे चीनमध्ये अनेक ठिकाणी दररोज ठराविक तासांसाठी विजेचा पुरवठा खंडीत केला जात असल्याचे त्या बातमीत म्हटले आहे. टंचाईमुळे त्यांना हे लोडशेडींग किंवा ज्याला आपण भारनियमन असे म्हणतो ते करावे लागतले आहे. अनेक चिनी कारखान्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. आधी करोना संकटामुळे औद्योगिक उत्पादनात घट झाली. आता विजेअभावी चीनच्या औद्योगिक उत्पादनात घट सुरू आहे.
अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर कडेने लावलेले दिवे तसेच वाहतुकीचे नियमन करणारे सिग्नल बंद आहेत. विजेच्या टंचाईमुळे पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि पाणी पुरवठा करणारी यंत्रणा बंद झाली आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लिफ्ट बंद झाल्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांचे हाल होत आहेत. विजेअभावी मोबाइलचे नेटवर्क पण कोलमडले आहे. मोबाइलला सिग्नल देणारे उंचच उंच अँटिना विजेअभावी बंद आहेत, असे एका संकेतस्थळावर देण्यात आलेल्या बातमीत नमूद करण्यात आले आहे.
प्रामुख्याने औष्णिक ऊर्जेवर अवलंबून असलेला चीन दरवर्षी ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कोळसा आयात करतो. यामुळे देशातील उत्पादन आणि आयात कोळसा या दोन्हीच्या जोरावर चीन विजेची मागणी पूर्ण करतो. पण ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या वादानंतर चीनने कोळसा आयात बंद केली. ऑस्ट्रेलिया ऐवजी इतर देशांमधून कोळसा खरेदी करण्याचा निर्णय चीनने घेतला. पण इतर देश चीनची मागणी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आणि चीनमध्ये कोळसा टंचाई निर्माण झाली. कोळश्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे औष्णिक ऊर्जेच्या उत्पादनात घट झाली. यामुळे चीनमध्ये विजेचे संकट निर्माण झाले.