नाशिक – शहरात होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनातील राजकीय हस्तक्षेपामुळे आधीच संमेलन चर्चेचा विषय ठरत असतानाच आता निधीच्या मुद्द्यावरून स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या एका गुगलीमुळे भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेची चांगलीच अडचण झाली आहे. साहित्य संमेलनावरून महाविकास आघाडी आणि भाजपमधील राजकारण पुन्हा रंगू लागले आहे.
यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडणार आहे. नाशिकला लाभलेला साहित्यिकांचा इतिहास बघता हे संमेलन नाशिकमध्ये व्हावे, अशी मागणी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य महामंडळाला करण्यात आली होती आणि या मागणीला यश आले असून 26 ते 28 मार्च दरम्यान शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हे संमेलन रंगणार आहे.
हे संमेलन आगळं वेगळं कसं होईल यासाठी नियोजन समिती प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून या संमेलनाला साहित्यिक-कवी हजेरी लावतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे आतापासूनच जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मुळात संमेलन पार पाडणं ही काही सोपी गोष्ट नसल्याने यासाठी आता निधी गोळा केला जातो.
नुकतेच राज्य सरकारने संमेलनासाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली तर संमेलनाच्या नियोजनासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नाशिकच्या आमदारांनी प्रत्येकी 10 लाख, तर महापालिकेने 50 लाख रुपये द्यावेत, अशी अपेक्षा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. दरम्यान, “उद्धव ठाकरेंकडे मी मागणी केली होती, महाराष्ट्र सरकारने 50 लाख रुपये दिले आहे. तसेच सरकारप्रमाणे महापालिकेचे महापौर, आयुक्त, गटनेत्यांनी निधी द्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.
निधीबाबत महापौरांचे दुमत
भुजबळांनी ही मागणी तर केली. मात्र, यामुळे महापालिकेची चांगलीच अडचण झाली असून निधीमुळे भुजबळ आणि महापौरांमध्ये दुमत असल्याचे दिसून येत आहे. आधीच करोनामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली असून उत्पन्नात साडेचारशे कोटी रुपयांची घट झाली आहे. यासोबतच महापालिकेला तीन लाखांची अनुदान मर्यादा असताना 50 लाख रुपये द्यायचे कुठून? असा प्रश्न महापौर सतीश कुलकर्णी यांनी उपस्थित केला.