जोशीमठ – उत्तराखंड जलप्रलयाला आठवडा उलटल्यानंतर बचाव कार्याला आणखी वेग देण्यात आला आहे. तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या 30 हून अधिक कामगारांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात मागील रविवारी हिमकडा कोसळून झालेल्या जलप्रलयाने मोठा तडाखा दिला. त्या दुर्घटनेत 38 जण मृत्युमुखी पडले. तर, 166 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्याशिवाय, एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचा बोगदा चिखलाने अक्षरश: बुजवून टाकला. त्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी चिखल हटवून आतपर्यंत जाण्यात बचाव पथकांना यश आले आहे.
मात्र, आणखी चिखल हटवून कामगारापर्यंत पोहचण्यासाठी मार्ग करावा लागणार आहे. त्यासाठी कामगार अडकल्याची शक्यता असणाऱ्या जागेपर्यंत मोठे छिद्र पाडण्यात येत आहे. त्यामधून कॅमेरा पाठवून कामगारांचा नेमका ठावठिकाणा शोधला जाणार आहे.
त्याशिवाय, छिद्रातून पाईप सोडून पाणीही उपसले जाणार आहे. बचाव कार्यासाठी एनटीपीसीच्या शास्त्रज्ञांचीही मदत घेतली जात आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील जलप्रलयात मृत्युमुखी पडलेल्यांत उत्तरप्रदेशच्या 5 रहिवाशांचा समावेश आहे. त्याशिवाय, त्या राज्यातील 64 रहिवासी अजूनही बेपत्ता आहेत.