जळगांव – रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात चार अल्पवयीन बालकांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील तीन संशयीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या हत्याकांडप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपींनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने चारही बालकांची
हत्या केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या चार बालकांमधील 14 वर्षीय मुलीवर आरोपींकडून लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे हत्याकांड बलात्कार करण्याच्या प्रयत्नांतून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या आई-वडिलांनी आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मुलांनी केलेलं कृत्य हे धक्कादायक असून माणुसकीला काळीमा फासणारं आहे, असंही आरोपीच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच या
खटल्यासाठी विशेष सरकारी वकिल म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करीत असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले आहे.