नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. तर, मागील महिन्यात भाजपने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पक्ष संघटनेत बढती दिली. त्यामुळे वयाची 75 वर्षे पार केलेल्या नेत्यांना रिटायर करण्याच्या स्वत:च्याच धोरणाला भाजप फाटा देत असल्याचे दिसते.
वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना निवडणूक रिंगणात न उतरण्याचे धोरण भाजपने अवलंबले आहे. त्यातून वयाचा ठराविक टप्पा पार केल्यानंतर राजकीय संन्यास घ्या, असा संदेशच त्या पक्षाकडून देण्यात आला. त्यामुळे अमरिंदर आणि येडियुरप्पा यांच्याशी संबंधित घडामोडी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अमरिंदर यांनी वयाची ऐंशी पार केली आहे. तर, पक्ष संघटनेत वजन वाढलेले येडियुरप्पा ऐंशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. मात्र, त्यांच्याशी संबंधित घडामोडींमागे भाजपचे बेरजेचे राजकारण असावे.
पंजाबमध्ये भाजपला अद्याप फारसा राजकीय प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे अमरिंदर यांच्यासारखा प्रभावी नेता उपयुक्त ठरू शकतो, असे त्या पक्षाचे राजकीय गणित असावे. अमरिंदर यांच्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये कामगिरी सुधारण्याची आशा भाजपला वाटत असावी.
कर्नाटकमध्ये पुढील वर्षीच्या मध्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या राज्याची सत्ता राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. अशात त्या राज्यात मोठा राजकीय दबदबा असणाऱ्या येडियुरप्पा यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात स्थान देण्यात आले. ते मंडळ पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत सर्वोच्च मानले जाते. त्यामुळे पक्षाकडून येडियुरप्पा यांना खूष ठेवण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.
पुढील लोकसभा निवडणुकीत बाजी मारण्याचा विश्वास भाजपला वाटत आहे. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा ते पद भुषवण्यास सज्ज होतील. पण, त्या स्थितीत मोदींच्या वयाचा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ शकतो. पुढील लोकसभा निवडणुकीवेळी मोदींचे वय 74 वर्षे असेल. त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित होऊ नये यासाठीच अमरिंदर आणि येडियुरप्पा यांना भाजपने महत्व दिले असावे, असे काही राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.