सोलापूर – सचिन वाझे यांच्यासोबत आतापर्यंत पाच ऑफिसर निलंबित झाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये जाण्याची पाळी आली. परमबीर सिंह घरी गेले, आता अनिल परब यांचा नंबर लागला आहे आणि त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नंबर लागणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी सोलापुरात केला.सोमय्या शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत. संजय राऊत यांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी एस. आर. ए. चे गाळे ढापले आहेत, हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड हे आता लायनीत आहेत.
त्यामुळे आगे आगे देखो होता हैं क्या !’ असं म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांसह आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनाही डिवचले आहे. सोमय्या यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच ढवळून निघाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या कोविड करप्शनला भाजप विरोध करत आहे. हे सरकार पाच वर्षे टिकावे मात्र, जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भाजपकडून मी करणार आहे, असेही सोमय्या यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा एवढा घमेंड करू नये. जालन्यात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना पाच पोलिसांकडून जी मारहाण झाली ती निंदनीय आहे.
त्यातील चार पोलीस निलंबित झाले आहेत, त्याचबरोबर या प्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी व्हायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.