यवतमाळ – भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेच्यावेळी पत्रकारांनी संजय राठोड प्रकरणी प्रश्न विचारताच चित्रा वाघ यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्रकारांवरच आगपाखड करीत पत्रकार परिषद अर्धवट सोडून तेथून निघून जाणे पसंत केले. तुम्ही कोणाची तरी सुपारी घेऊन हे प्रश्न विचारात आहात असा आरोप त्यांनी पत्रकारांवर केला आणि यापुढे असल्या पत्रकारांना पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण देत जाऊ नका असे त्यांनी सुनावले.
संजय राठोडे हे उद्धव ठाकरे यांच्या सरकार मध्ये मंत्री असताना त्यांच्या विरोधात पुजा चव्हाण या युवतीच्या मृत्यू प्रकरणावरून चित्रा वाघ यांनी चांगलेच मैदान गाजवत अनेक पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. पण आज भाजपच्याच युती सरकारमध्ये संजय राठोड हे पुन्हा मंत्री झाले आहेत.
पुजा चव्हाण प्रकरणी नव्या सरकारने संजय राठोड यांना क्लीन चिट दिली आहे काय आणि तुम्ही या विषयावर आता मवाळ भूमिका घेत आहात काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर चित्रा वाघ यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्रकारांवरच आरोप करीत तेथून काढता पाय घेतला.