नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री (पंतप्रधान) नरेंद्र मोदी यांची एका कथित चौकशीत चौकशी केली होती. गुजरातमधील बनावट चकमक प्रकरणात त्यांना गोवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
‘न्यूज 18 रायझिंग इंडिया’ कार्यक्रमादरम्यान, नरेंद्र मोदी सरकारविरोधी नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा ‘दुरुपयोग’ करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा बोलत होते.
शहा म्हणाले की, कॉंग्रेस सरकारच्या काळात कथित बनावट चकमक प्रकरणात मोदींना, ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना, अडकवण्यासाठी सीबीआय माझ्यावर दबाव आणत होती. असे असूनही भारतीय जनता पक्षाने (भाजप) कधीही गदारोळ केला नाही. ना सरकारविरोधात आगपाखड केली, ना सीबीआयविरोधात कोणी बोलले.
सुरत येथील न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवल्याबद्दल गृहमंत्र्यांनी सांगितले की, कॉंग्रेस नेता हा एकमेव व्यक्ती नाही ज्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे आणि लोकसभेचे सदस्यत्व गमावले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात जाण्याऐवजी राहुल रस्त्यावर राडा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोष देत आहेत.
अमित शाह म्हणाले की, पंतप्रधानांवर दोषारोप करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी राहुल गांधींनी स्वतःच्या आरोपाविरुद्ध लढण्यासाठी उच्च न्यायालयात जावे. राहुल गांधींनी त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी अजूनही अपील केलेले नाही.
हा कसला अहंकार आहे? तुम्हाला उपकार हवे आहेत. तुम्हाला खासदार म्हणून राहायचे आहे आणि न्यायालयातही जायचे नाही. असे कसे होईल? राहूल यांनी कसलाही दंगा न करता वस्तुस्थितीला खुल्या मनाने सामोरे जाणे आवश्यक आहे, असे शहा शेवटी म्हणाले.