भोपाळ – मध्य प्रदेशात बर्ड फ्लू वेगाने पसरत असून आतापर्यंत 13 जिल्ह्यांमध्ये कावळे मरण पावल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. आगर मालवा जिल्ह्यात पुढील सात दिवसांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे.
इंदूर, मंदसौर, अगर, नीमुच, देवास, उज्जैन, खांडवा, खारगाव, गुना, शिवपुरी, राजगढ, शाजपूर, आणि विदिशा या 13 जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने कावळे मरण पावल्याचे निष्पन्न झाले आहे. एकूण 27 जिल्ह्यांमध्ये 1100 पेक्षा अधिक कावळे आणि अन्य जंगली पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत.
भोपाळ येथील प्रयोगशाळेत 32 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ही साथ पसरू नये म्हणून इंदूर, निमुच आणि आगर जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय आठ दिवस बंद ठेवण्यात आला असून या काळात पक्षी आणि अंड्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सेहोर, बालाघाट, दामोह, बेतूल आणि भिंड जिल्ह्यातून पाठवलेल्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचे विषाणू नसल्याचे निष्पन्न झाले आहे.