पाटणा – बिहारमधील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपल्या नेत्यांना जागते रहो चा संदेश दिला आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं (ईव्हीएम) ठेवण्यात आलेल्या ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा आदेश पक्षाने नेत्यांना दिला आहे.
राजद, कॉंग्रेस आणि लहान पक्षांचा समावेश असणाऱ्या विरोधकांच्या महाआघाडीची बिहारमध्ये सरशी होण्याची शक्यता असल्याचे संकेत मतदानोत्तर चाचण्यांनी दिले आहेत. त्यामुळे खुषीत असणाऱ्या कॉंग्रेसकडून निकालाआधी पुरेशी काळजीही घेतली जात आहे. ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असा आरोप नेहमीच होत असतो.
त्यामुळे ईव्हीएमशी कुठली छेडछाड होऊ नये यादृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना पक्षाने बिहारमधील आपल्या नेत्यांना दिल्या आहेत. त्या राज्यात 38 जिल्हे आहेत. ज्येष्ठ नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्येच उपस्थित राहावे, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. कुणालाच बहुमत नसणारी त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास पुढील रणनीती ठरवण्याच्या दृष्टीनेही कॉंग्रेसकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे.
नवनिर्वाचित आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी त्यांना एकत्र ठेवण्याच्या उद्देशातून पक्षाने आधीच फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी रणदीप सुर्जेवाला, अविनाश पांडे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना पक्षाने आधीच बिहारला पाठवले आहे.