पाटना – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे स्वार्थी असल्याची टीका भाजपाचे नेते गोपाळ नारायण सिंग यांनी केली आहे. मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या याच निर्णयावर भाजपा नेते गोपाळ नारायण सिंग यांनी टीका केली आहे.
नितीशकुमार हे फक्त त्यांच्या फायद्याचा विचार करतात. त्याचप्रमाणे ते निर्णय घेतात किंवा बदलतात असेही गोपाळ नारायण सिंग यांनी म्हटले आहे.
मंत्रिपदासाठी आमच्यासोबत असलेल्या इतर एकाही पक्षाने आग्रह धरला नाही. तरीही आम्ही जदयूला एक मंत्रिपद देऊ केले होते आणि ते त्यांनी नाकारले. नितीशकुमार यांच्या जदयूने जरी मंत्रिपद स्वीकारले नसले तरीही आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत आम्ही त्यांची साथ सोडणार नाही, असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीशकुमार स्वार्थी आहेत अशी टीका त्यानी केली. आम्ही त्यांच्या या दबावतंत्राला बळी पडणार नाही, असे ते म्हणाले.
कधीच मंत्रिमंडळात जाणार नाही – नितीश
सत्तेतील भागीदारीसाठी द्यायचे म्हणून एक मंत्रिपद नको, अशी भूमिका पक्षाच्या कोअर टीमने घेतली. जेडीयू आता कधीच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे जेडीयूचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत मंत्रिमंडळातील जेडीयूच्या समावेशाबाबत चर्चा झाली. त्यावेळी एनडीएच्या घटक पक्षांना प्रत्येकी एक मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावेळीच आपण याची काही आवश्यकता नसल्याचे सांगितले.