पाटणा – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (मंगळवार) जाहीर होणार आहे. बिहारची सत्ता पुन्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे जाणार की सत्ताबदल होऊन विरोधकांच्या महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, ते निकालामुळे स्पष्ट होईल.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. त्यासाठी 3 टप्प्यांत मतदान झाले. आता प्रतीक्षा निकालाची आहे. बिहारच्या 38 जिल्ह्यांमधील 55 केंद्रांवर मतमोजणी होईल. मतमोजणी केंद्रांबरोबरच निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये या उद्देशातून राज्यभरात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
बिहारच्या सत्तेसाठी प्रामुख्याने जेडीयू-भाजपचा समावेश असणारी एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत अटीतटीची लढत झाली. आता बिहारची सत्ता कुणाकडे जाणार याचे उत्तर मतमोजणीमुळे मिळेल.
नितीश सलग 15 वर्षे त्या राज्याच्या सत्तेवर आहेत. मात्र, यावेळी मुरब्बी आणि अनुभवी नेते असणाऱ्या नितीश यांच्यापुढे तरुण नेते तेजस्वी यांनी तगडे आव्हान उभे केले. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी विरोधकांच्या महाआघाडीची सरशी होण्याचे म्हणजेच सत्ताबदलाचे अंदाज वर्तवले आहेत. ते अंदाज खरे ठरणार का, हेही मतमोजणीमुळे समोर येईल.