पाटणा –बिहार विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने बुधवारी जाहीरनामा जारी केला. त्यामध्ये सत्ता मिळाल्यास 10 लाख सरकारी नोकऱ्या, कृषी कर्जमाफी आणि दरमहा 1 हजार 500 रूपये बेरोजगारी भत्ता देण्याची आश्वासने देण्यात आली आहेत.
येथील कॉंग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात ज्येष्ठ नेते-अभिनेते राज बब्बर यांच्या हस्ते पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला बदलाव पत्र (परिवर्तन पत्र) असे नाव दिले आहे.
राजद, कॉंग्रेस आणि इतर लहान पक्षांचा समावेश असणाऱ्या विरोधकांच्या महाआघाडीने याआधीच मतदारांसाठीची आश्वासने जाहीर केली होती. त्यानंतर सरकारी नोकऱ्यांच्या आश्वासनावरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महाआघाडीची खिल्लीही उडवली. त्याचा समाचार बब्बर यांनी घेतला.
महाआघाडी विजयी झाल्यास पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत नोकऱ्यांबाबतचे आश्वासन पूर्ण करण्यात येईल. आमची खिल्ली उडवणारेच चेष्टेचा विषय बनतील. नितीश त्यांच्या कार्यकाळात सहजपणे साडेचार लाख नोकऱ्या उपलब्ध करू शकले असते, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. दरम्यान, विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात केंद्रीय कृषी कायदे रद्दबातल ठरवण्यासाठी पाऊले उचलण्याची ग्वाहीही कॉंग्रेसकडून देण्यात आली आहे.