पाटणा – बिहार विधानसभेच्या मतमोजणीला आज कमालीपेक्षा खूपच विलंब लागला. त्यामुळे आज सकाळी आणि दुपारी उशिरापर्यंत या राज्यात नेमके काय होईल हे कोणालाच सांगता येणे शक्य नसल्याने सर्वच जण हवालदील झाल्याचे चित्र आज पहायला मिळाले.
सुरूवातीच्या टप्प्यात आघाडीवर असलेली महाआघाडी सकाळी अकराच्या नंतर मात्र मागे पडत केली आणि चक्क एनडीएने सत्तेचा 122 चा जादुई आकडा पार करून सगळ्यांनाच चकीत केले. तथापि या आकडांवर खुद्द भाजप व जेडीयुचे नेतेच फार विश्वास दाखवताना दिसत नव्हते.
एरवी थोडा जरी अनुकुल ट्रेंड दिसला की विजयाच्या फुशारक्या सुरू करणाऱ्या राजकीय नेत्यांनी इलेक्शन निकालाचा स्वींग पाहून जरा शांतच राहणे आज सुरूवातीच्या काळात पंसत केले होते.
तथापि महाआघाडीला मागे टाकून एनडीएने मारलेली मुसुंडी सर्वांनाच अवाक करून गेली.
नेमकी किती मते मोजून झाली आहेत आणि हा नेमका काय ट्रेंड आहे हे कोणालाच कळेनासे झाले होते. दुपारी दीडच्या सुमाराला बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या स्थितीची नेमकी माहिती दिली. दुपारी दीडच्या सुमाराला 4 कोटी 17 लाख मतांपैकी जेमतेम 80 लाख मते मोजून झाल्याचे त्यांनी नमूद केल्याने महाआघाडीच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या तर एनडीए नेत्यांची धाकधुक वाढली होती.
मुख्य निवडणूक आधिकाऱ्यांनी सांगितले की, करोनामुळे मतमोजणीच्या ठिकाणी काही विशेष नियम लागू करून दक्षता बाळगली गेली आहे त्यामुळे मतमोजणीला विलंब होत आहे. सर्व निकाल हाती येण्यास रात्री उशिरापर्यंतचा वेळ लागू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की यावेळी करोनामुळे जादा मतदान केंद्रे उघडली गेली होती. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांची संख्याही नेहमी पेक्षा 60 टक्के अधिक ठेवण्यात आली होती. त्यामुळे इतक्या साऱ्या यंत्रांवरील मतांच्यामोजणीला विलंब लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे बिहारचे नवे सत्ताधारी कोण या विषयीचा सस्पेन्स सायंकाळी उशिरा पर्यंत कायम होता.