पाटणा – बिहारमधील सत्तारूढ एनडीएमधून बाहेर पडून स्वबळावर लढणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाला (लोजप) स्वत:चा ठसा उमटवण्यात सपशेल अपयश आले. मात्र, जेडीयूला राजकीय तडाखा देण्याचे उद्दिष्ट गाठण्यात त्या पक्षाला लक्षणीय यश आले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू आणि लोजपमध्ये मोठी दरी निर्माण झाली. त्यातून लोजप विधानसभा निवडणुकीआधी एनडीएमधून बाहेर पडला. त्या पक्षाने नितीश आणि जेडीयूविरोधात प्रचार केला. मात्र, भाजपविषयी नेहमीच सहानुभूती दाखवली.
लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान निवडणूक काळात सातत्याने भाजपबरोबर आम्ही सरकार स्थापन करू, असा दावा करत राहिले. मात्र, खातेही खोलता न आल्याने लोजपला सरकार स्थापनेत काहीच महत्व उरलेले नाही. तसे असले तरी, जेडीयूचे संख्याबळ लक्षणीय प्रमाणात घटवण्यात लोजप फॅक्टर महत्वाचा ठरल्याचे दिसून येत आहे.
लोजपने प्रामुख्याने जेडीयूविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे जेडीयूला सुमारे 30 जागा गमवाव्या लागल्याचे प्राथमिक चित्र आहे. जेडीयूचे संख्याबळ घटल्याने आता एनडीएमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप दिसणार आहे.
जेडीयूला रोखण्यासाठी भाजप आणि लोजपने छुपा समझोता केल्याची चर्चा सतत झाली. दोन्ही पक्षांकडून त्याचा वारंवार इन्कार करण्यात आला. आता स्वत: बुडणाऱ्या लोजपने आपल्यासमवेत जेडीयूलाही तळ दाखवल्याचे समोर आले आहे.