नवी दिल्ली – गेली काही वर्षे भारतात अज्ञातवासात राहात असलेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना भारताने आज आणखी एक वर्षासाठी रहिवासी परवाना वाढवून दिला. त्यावर समाधान व्यक्त करून सरकार मला कायमस्वरूपी रहिवाशी परवाना देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
तस्लिमा म्हणाल्या, भारत हे माझे घर आहे. मी भारताची कन्या आहे. त्यामुळे मला भारतात राहण्यासाठी एक वर्षाचा रहिवासी परवाना देण्याऐवजी मला 5 वर्षे, 10 वर्षे किंवा कायमस्वरूपी परवाना सरकारने द्यावा. 2014 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही मी तशी विनंती केली होती. मूळच्या बांगलादेशी असलेल्या तस्लिमा यांची लज्जा कादंबरी वादग्रस्त ठरली. कट्टरवादी मुस्लिमांच्या विरोधानंतर बांगलादेशनंतर त्यांनी स्वीडनचे नागरिकत्व घेतले. 2004 पासून त्या भारतात राहात आहेत.