नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याच्यावेळी त्यांच्या मोटारींच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला होता, त्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालय आता पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात अधिक आक्रमक झाले असून त्यांनी त्या राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना 14 डिसेंबर रोजी दिल्लीत पाचारण केले आहे.
काल झालेल्या घटनांच्या संबंधान त्यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील अन्यही कायदा आणि सुव्यवस्था स्थितीच्या संबंधात त्यांच्याकडून माहिती घेतली जाणार आहे. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था स्थिती कमालीची बिघडली आहे असा अहवाल राज्यपाल जगदीप धनकर यांनी गृहमंत्रालयाकडे पाठवल्यानंतर गृहमंत्रालयाने या दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीत पाचारण केले आहे.
जे.पी. नढ्ढा आणि अन्य भाजप नेत्यांच्या मोटारींचा ताफा 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर कडे जात असताना वाटेत त्यांच्या ताफ्यावर काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात काही भाजप नेते जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या प्रकरणात राज्यपालांनी अहवाल सादर केला आहे पण राज्य सरकारचा अहवाल अजून आलेला नाही.हा भाजपच्याच लोकांनी राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी केलेला हल्ला होता असे पश्चिम बंगाल सरकारचे म्हणणे आहे.