गुवाहाटी – आसाम विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने नवीन चेहऱ्यांवर भर देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते आहे. पक्षाने पहिले जे 40 उमेदवार जाहींर केले आहेत त्यातील निम्मे चेहरे नवीन आहेत. सहा विद्यमान आमदारांना त्यात पुन्हा संधी देण्यात आली आहे.
पक्षाने अजून तितोबार मतदार संघातील उमेदवार मात्र अजून जाहीर केलेला नाही. या मतदार संघातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई हे सलग चार वेळा निवडून आले आहेत. त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी कोणाला उमेदवारी द्यायची या विषयी कॉंग्रेस नेते त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करीत आहेत. त्या संबंधात लवकरच निर्णय घेतला जाईल असे कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले.
दरम्यान, अन्य राज्यांप्रमाणेच याही राज्यांत कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला आपल्याच पक्षाच्या पुर्वाश्रमीच्या उमेदवाराशी लढत द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसने जे 40 उमेदवार जाहीर केले आहेत त्यात 12 महिलांना स्थान देण्यात आले आहे. आसामात 126 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे.