मुंबई – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गावर गंभीर परिणाम झाले आहेत.
या प्रकरणी कोणतीही उणीव न ठेवता कायदेशीर तोडगा काढावा, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
नवी दिल्ली येथील सरकारी वकिलांची भेट घेऊन अशोक चव्हाण यांनी आज सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणाचा आढावा घेतला. या भेटीत सरकारी वकील राहुल चिटणीस व सचिन पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया यांच्या सल्ल्याबाबतही अशोक चव्हाण यांनी उभय वकिलांकडून विस्तृत माहिती घेतली.
अशोक चव्हाण म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे एसईबीसी प्रवर्गाचे नोकर भरतीतील उमेदवार व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी कायदेशीर तोडगा काढण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही उणीव राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, अशी लेखी मागणी राज्य शासनाने यापूर्वी तीन वेळा केलेली आहे. राज्य शासनाच्या या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे 2 नोव्हेंबर रोजी सूचित करण्यात आले.
यासंदर्भातील अर्ज 20 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला होता व 7 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर व 2 नोव्हेंबर रोजी तो मेन्शनही करण्यात आला असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.