पंढरपूर – प्रतिकात्मक स्वरूपात का होईना पायी वारी सोहळ्याला परवानगी द्यावी. आम्ही कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करू असे आश्वासन पालखी सोहळाप्रमुखांनी राज्य सरकारला दिले आहे.
त्यासाठी दहा संस्थानांनी सरकारपुढे तीन पर्याय ठेवले आहेत. त्यानुसार कोरोना नियंत्रणात आला तर पाचशे, मध्यम परिस्थितीत राहिला तर दोनशे आणि सद्यस्थिती कायम राहिल्यास शंभर वारकर्यांना घेऊन पायी वारी सोहळ्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच 11 जूनच्या आता निर्णय व्हावा अशी अपेक्षा वारकर्यांनी व्यक्त केली आहे.
शेकडो वर्षांची वारीची परंपरा ही कोरोनाची दुसरी लाट आणि संभाव्य तिसरी लाट यांच्यादरम्यान आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर, ग्रामीण व्यवस्थेवर ताण येऊ न देता हा सोहळा कसा पार पाडता येईल, यासाठी गेल्या महिनाभरापासून पालखी सोहळाप्रमुख आणि संस्थाने प्रयत्न करत आहेत. शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळून पायी वारी करण्याची परवानगी मिळावी, ही सर्वच संप्रदायाची भूमिका आहे. चालणार्या वारकर्यांची संख्या, आरोग्य, बंदोबस्त याबाबतच्या सर्व सूचना तंतोतंत पाळल्या जातील.
11 जूनपूर्वी निर्णय अपेक्षित
1 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांचे प्रस्थान, 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचे प्रस्थान तर 6 जुलै रोजी सोपानदेवांचे प्रस्थान आहे. या तिन्ही पालख्या पुणे जिल्ह्यातून निघणार आहेत. त्यापूर्वी 14 जून रोजी संत मुक्तांई यांचे पालखी प्रस्थान जळगावमधून होणार आहे. त्यांचा 34 मुक्काम 530 किमीचा प्रवास असणार आहे. त्यामुळे पालख्यांच्या बाबतीत निर्णयांची स्पष्टता 10 ते 11 जूनपर्यंत होणे अपेक्षित आहे.