नवी दिल्ली – आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दबावात घेण्यासाठी केंद्र सरकारने आता त्यांच्याशी संबंधीत लोकांवर छापे घालण्यास सुरूवात केली आहे. त्याचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की आज सारा देशच शेतकऱ्यांच्या मागे असून मोदी सरकार किती जणांवर छापे मारू शकणार आहे?. शेतकऱ्यांचे आंदोलन कमकुवत करण्यासाठीच ही छापेमारी केली जात आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
पंजाबातील आडत्यांना आयकराच्या नोटीसा जारी करण्यात आल्या असून त्यातील काही जणांवर छापे टाकले गेले आहेत. ज्या आडत्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यांना या पद्धतीने लक्ष्य केले जात आहे.
कृषी मालाच्या व्यापाऱ्यांना अशा पद्धतीने छळणे सर्वस्वी अयोग्य आहे असे केजरीवालांनी म्हटले आहे. आज ट्विटरवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली असून या छाप्यांच्या बातम्यांची कात्रणेही त्यांनी जोडली आहेत. पंजाबात घालण्यात आलेल्या या छाप्यांचा पंजाबचे मुख्यमंत्री कॅ अमरिंदरसिंग यांनीही निषेध केला आहे.
शेतकऱ्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी अशा प्रकारची कृती सहन केली जाणार नाही असा इशाराहीं त्यांनी दिला आहे. येनकेन प्रकारे त्यांना शेतकऱ्यांचे आंदोलन दाबून टाकायचे आहे असेही अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.