नवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवून त्यांच्यावर टीका केली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी आज केजरीवाल यांना विचारणा केली असता त्यांनी अण्णांचे नावही घेतले नाही. मात्र त्यांना भाजपने पुढे केले असल्याचा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की जेव्हा हे (भाजप/ केंद्र सरकार) काही सांगत असतील आणि नागरिक त्यांचे ऐकत नसतील तर ते कोणालातरी पुढे करतात. पंजाबमधील निवडणुकांच्या अगोदरही त्यांनी असेच केले. ते म्हणाले की केजरीवाल दहशतवादी आहेत. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मग त्यांनी कुमार विश्वास यांना पुढे केले. आता ते म्हणतात, दिल्लीत दारू घोटाळा झाला. सीबीआयने रेड मारली. 14 तास मनीष सिसोदिया यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यांना काहीच सापडले नाही.
सीबीआयही म्हणते घोटाळा झालेला नाही. मग आता त्यांनी यांना (अण्णा हजारे) पुढे केले. दिल्लीत आता यावर राजकारण व्हायला नको असे मला वाटते. दिल्लीत 20 कोटी देऊन आमदार विकत घेण्याचा प्रयत्न झाला. मला वाटते याची चौकशी होण्याची गरज आहे. आम्ही तपासापासून पळ काढत नाहीये. मग हे तपासाला का घाबरत आहेत?