नागपूर – गडचिरोली जिल्ह्यात कोसमी-किसनेली जंगलात पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी मोहीम राबवून पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या या कामगिरीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.
गडचिरोलीच्या पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी केली असून त्यांच्या या कामगिरीमुळे गेल्या सहा ते सात महिन्यांत नक्षलवादी कारवायांमध्ये मोठी घट झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गृहमंत्र्यांनी नागपुरात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत नागपुरातील गुन्हेगारी आणि लॅंड माफियांच्या विरोधातील कारवाईचाही आढावा घेतला. त्यावेळी बोलताना त्यांनी हे कौतुक केले.
नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी त्यांनी जी बैठक बोलावली होती, त्याला नागपूरचे पोलीस आयुक्त व महसूल विभागाचेही आधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी समाजकंटक आणि लॅंड माफियांच्या विरोधात सुमारे 50 तक्रारी दाखल केल्या.