कोलकाता – बंगालचे वैभव जपण्याची गरज असून तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे बंगालचे वैभव हरपत चालले आहे अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
बंगाल ही चैतन्य महाप्रभू, श्री रामकृष्ण, आणि स्वामी विवेकानंद यांची भूमी आहे. एकेकाळी ही भूमी अध्यात्माची केंद्रभूमी होती. पण येथे तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे बंगालचे हे सारे वैभव नष्ट होत चालले आहे असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर बंगालच्या जनतेने जागृत होऊन राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्यास सज्ज व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी त्या राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. आज दुसऱ्या दिवशी त्यांनी दक्षिणेश्वर मंदिराला भेट देऊन तेथे पूजा केली. त्यानंतर ते बोलत होते.