नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेला शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. हॉलिवूडची पॉप सिंगर रिहाना हीने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने तिला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. मात्र, कंगनाने आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले आहे.
कंगनाच्या ट्विटनंतर अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगन यांनीदेखील रिहानाच्या ट्विटवर टीका करत भारताची एकता आणि अखंडता नेहमी अबाधित आहे आणि राहील, असा संदेश दिला. त्यानंतर आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत या विषयावर भाष्य केलं आहे.
कोणताच प्रपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही. आम्ही एकजुटीने प्रगतीच्या दिशेने जाऊ. कोणताच चुकीचा प्रचार भारताला प्रगतीचा दिशेला जाण्यापासून रोखू शकत नाही. हे अशाप्रकारचे प्रपोगांडा भारताच्या भविष्याचा निर्णय घेऊ शकत नाही. भारताची प्रगतीसाठी एकजूट आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.