कोल्हापूर – करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. सायंकाळी सहा नंतर मंदिर दर्शनासाठी बंद राहील. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, ता. १९ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह, ओढयावरील सिद्धीविनायक, आझाद चौकातील श्री दत्तभिक्षालिंग मंदिर, महाद्वार रोड येथील श्री बिनखांबी गणेश मंदिर, बागल चौकातील श्री पंचमुखी मारुती, श्री त्र्यंबोली देवस्थान टेंबलाईवाडी आणि श्री कात्यायनी देवी बालिंगा या ठिकाणी दर्शनाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी राहील. सायंकाळी सहा वाजल्यापासून ही सर्व मंदिर दर्शनसाठी बंद करण्यात येतील.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, ‘दर्शनास येताना मास्क लावणे बंधनकारक आहे. भाविकांनी दर्शन रांगेत सुरक्षित अंतर ठेवून दर्शन घ्यावे. भाविकांनी सायंकाळी सहानंतर मंदिर व मंदिर आवारामध्ये गर्दी करु नये.’