चेन्नई – अण्णाद्रमुक या तामीळनाडूतील सत्ताधारी पक्षाने 14 डिसेंबरला मंत्री आणि आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या पक्ष स्थापनेच्या घोषणेने अण्णाद्रमुक धास्तावल्याचे मानले जात आहे.
तामीळनाडूत पाच ते सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच रजनी यांनी नववर्षात नवा राजकीय पक्ष स्थापण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे नवा पक्ष प्रस्थापित पक्षांपुढे मोठे राजकीय आव्हान उभे करू शकतो, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
त्यापार्श्वभूमीवर, आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी अण्णाद्रमुकने बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला मुख्यमंत्री के.पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम उपस्थित राहणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती करण्याचे सूतोवाच अण्णाद्रमुकने याआधीच केले आहे. मात्र, रजनी यांच्या पक्षामुळे तामीळनाडूतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी रजनी यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे अण्णाद्रमुक आणि भाजप युती कायम राहणार का, असा प्रश्नही पुढे आला आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकच्या बैठकीचे महत्व वाढले आहे.