आळंदी – तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत संपूर्ण आळंदी शहराचा विकास झाला; परंतु जो रस्ता सुरुवातीच्या काळातच व्हायला पाहिजे होता तोच आळंदी नगरपरिषद आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा यांच्याकडून भैरवनाथ चौक ते पद्मावती मंदिर हा अवघा दीड किलोमीटरचा रस्ता दुर्लक्षित राहिला असल्याने स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असून चिखलातून मार्ग काढताना पादचाऱ्यांची कुंचबणा होत आहे. तर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याविषयी अनेकवेळा आवाज उठवण्यात आला, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. वेळोवेळी या रस्त्याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला तरी देखील या रस्त्याकडे आळंदी नगरपरिषद आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा यांना लक्ष देण्यास वेळ नाही, तरी आगामी महिन्याभरात या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास सनदशीर मार्गाने आणि करोनाचे सर्व नियम पाळून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा अखेरचा इशारा अवरित फाउंडेशनच्या वतीने नगरपालिकेला देण्यात आला आहे.
या खराब रस्त्यामुळे भाविक नागरिक वाहनचालक यांना फार मोठी कसरत करून या मार्गावरून प्रवास करावा लागतो त्यामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी या गंभीर बाबीकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालून आंदोलन छेडण्यातपूर्वी या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्याकडे करण्यात आली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निसार सय्यद यांनी सांगितले.