मुंबई – महाराष्ट्रात पुढील काळात दोन उपमुख्यमंत्रीपदं असणार आहेत तसेच काही खात्यांमध्ये अदलाबदल होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अशी कोणतीही चर्चा नाही’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते जनता दरबारमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सरकारमधील खातेवाटपाचा प्रश्न विचारला असता, या बातम्या मीडियातील आहेत, याबाबत कोणतीही चर्चा नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भविष्यात मंत्रीपद मिळेल, काॅंग्रेसला उपमुख्यमंत्रिपद आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद जाईल, अशी चर्चा आहे. त्यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, अशी कोणतीही चर्चा सुरू नाही. थोडीशी नव्हे तर तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे नेमकी ही चर्चा कुठे आहे, ते मला कळू शकणार नाही असा मिश्किल टोलाही पवार यांनी लगावला.