नगर – ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकांत सर्रासपणे मास्क न लावणे, गर्दी करणे, अशी ढिलाई आढळून येत आहे. करोना नष्ट झालेला नाही. व्हॅक्सीनेशन आले असले, तरी गाफील राहणे उपयोगाचे नाही. करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे नाईलाजाने लॉकडाऊन करावे लागेल. ते टाळायचे असेल, तर करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावेच लागेल, अशी तंबी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
करोना परिस्थितीच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कडक निर्बंधाच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यकारी अधिकारी संदीप निचित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा, महापालिकेचे आरोग्याधिकारी अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘‘विदर्भात अमरावती, वर्धा तसेच पुणे, मुंबई परिसरात करोना बाधितांचे प्रमाण वाढल्याचे निष्पन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेता साशंकता निर्माण होणे सहाजिक आहे. याचे भान बाळगून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.’’
मंगल कार्यालयांचा परवानाच होणार रद्द..!