नगर, दि. 30 (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यात करोना रुग्णवाढीचा आज अक्षरश: ब्लास्ट झाला आहे. नव्या रुग्णसंख्येने कळस केला असून, बाधितांची संख्या आज तब्बल 3 हजार 953 वर पोचली आहे. आज झालेली रुग्णवाढ ही अत्यंत भीतीदायक आहे. त्यातही नव्याने बाधित होणार्या अनेक रुग्णांची तब्बेत अत्यंत वेगाने बिघडत असल्याचेही नवे वैद्यकीय निदान समोर येत आहे.
नागरीकांना आता स्वत:ची काळजी घेण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक नसल्याचे उघड वास्तव असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. काल नवीन रुग्णसंख्या तीन हजारांच्या आत आल्याने नगरकरांा थोडे हायसे वाटले होते. त्यात नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक असल्याने नगरमध्ये अत्यंत दिलासादायक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली होती.
मात्र, रुग्णसंख्या कमी झाली अन् बरे होणार्यांची संख्या एक दिवस वाढली की, नगरकरांमध्ये नवचैतन्य निर्माण होते अन् रस्त्यावर अत्यावश्यक सेवेकर्यांसोबतच मोक्कार फिरणार्यांची संख्याही वाढते. त्यातूनच पुन्हा-पुन्हा ब्लास्ट होईल, अशी करोनाबाधितांची नवीन आकडेवारी स्पष्ट होते, अशी माहिती वैद्यकय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
दररोज वाढणार्या करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आता थेट फुफ्फुसात करोना संसर्ग पोचला असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. अनेकजण इतर साधा थंडी-ताप असेल किंवा साधा आजार असेल, असे समजून काही अंगावरच काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तुलनेने जास्त धोका होत आहे. उशिराने तपासणी केल्यानंतर त्यांचा ‘स्कोर’ही अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना कोविड रुग्णालयात अॅडमीट करण्यासाठी नातेवाईकांचीच मोठी कसरत सुरु आहे.
दरम्यान, आता घरात एक रुग्ण जरी आढळला असला तरी संपूर्ण घराची चाचणी करण्याकडे कल वाढत आहे. चाचणी करुन घेण्यासाठीचा कल आणखी वाढायला हवा, असे तज्ज्ञांचे मत आहे. मृतांचा आकडाही दररोज वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून येणारी मृतांची आकडेवारी आणि नालेगाव अमरधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कारासाठी येणार्या मृतदेहांची आकडेवारी, यात मोठीच तफावत आढळून येत आहे. त्यामुळे आतातरी नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.