मोरैना (मध्य प्रदेश), दि. 15- दिल्लीत आंदोलनाला बसलेले शेतकरी नेते आता ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत, तेथेही सक्रिय झाले आहेत. प. बंगालच्या जनतेने कोणालाही निवडून द्यावे, मात्र भारतीय जनता पार्टीचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी दोनच दिवसांपूर्वी केले होते. त्यावरून आता भाजपचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या या नेत्यांवर आक्रमण सुरू केले आहे.
मध्य प्रदेशातील मोरैना येथे बोलताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की शेतकरी नेत्यांना आपले स्वत:चे निर्णय घेता येत नाहीत अन ते जगाची उठाठेव करायला चालले आहेत. ते शेतकरी आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करावी. सरकार चर्चेला तयार आहे व चर्चेमुळे सगळ्यांचाच फायदा होणार आहे. दगडावर डोके आपटून काहीही साध्य होणार नाही.
दरम्यान, भाजपचे अन्य नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलानावर टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पार्टीवर गोळी चालवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तर भाजपचे अन्य नेते हरनाथ सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांचे आंदोलन शेतकऱ्यांसाठी सुरू नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सुरू असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. छोटे आणि मध्यम शेतकरी त्यांना (टिकैत) यांना मुळीच किंमत देत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, टिकैत यांनीही भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. केंद्रातले सरकार कोणत्या राजकीय पक्षाचे नसून व्यापारी लोक देश चालवत आहेत. लुटारू लोक सत्तेवर आले असून आपल्याला त्यांच्या विरोधात लढायचे आहे. हा लुटारूंचा शेवटचा बादशहा असेल व त्याला सत्तेवरून घालवायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज देश बंदीस्त आहे. गुजरात बंदीस्त आहे. आपल्याला देशाला स्वतंत्र करायचे असल्याचा दावा त्यांनी केला.