नवी दिल्ली – ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी बिहार निवडणुकीतील पराभवावरून पुन्हा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्या अनुषंगाने कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांनी पक्षातील नाराज लोकांना पक्ष सोडून जाण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा जाहीर सल्ला दिला आहे.
एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना चौधरी म्हणाले की ज्यांना कॉंग्रेस हा योग्य पर्याय वाटत नाहीं त्या नेत्यांनी स्वत:चा वेगळ पक्ष काढायला हरकत नाही. पक्षाच्या स्थितीविषयी अशी जाहीर नाराजी कोणत्याही नेत्यांनी व्यक्त करणे अयोग्य आहे असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे, की ही नेते मंडळी गांधी परिवाराची निकटवर्तीय नेते मंडळी मानली जातात.
त्यामुळे ते लोक कधीही पक्षाच्या नेतृत्वाशी या संबंधात थेट बोलू शकतात. पण ते न करता कोणी पक्षाला नाउमेद करणारी विधाने करू नयेत असे चौधरी यांनी नाराज कॉंग्रेस नेत्यांना सुनावले आहे. त्यांनी कोणाचे नाव घेण्याचे टाळले आहे.
पक्षाला नामुष्की येईल अशी विधाने करणारे हे नेते बिहार निवडणुकीत कोठे होते, तेथे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात त्यांनी काय योगदान दिले असा सवालही चौधरी यांनी उपस्थित केला आहे. कॉंग्रेसचे पुनरूत्थान व्हावे अशी खरीच या नेत्यांची इच्छा असेल तर त्यांनी आपली क्षमता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करून सिद्ध करावी असे आव्हानही चौधरी यांनी या मुलाखतीत दिले.
कपिल सिब्बल यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पक्षात मत व्यक्त करण्यासाठी कोणतेही व्यासपीठच उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच बिहार व अन्य राज्यातील निवडणुकांमध्ये मोठे अपयश येऊनही काहीच बिघडलेले नाही अशा अविर्भावात पक्षाचे कामकाज आहे तसेच सुरू ठेवणे अयोग्य आहे असे मतही सिब्बल यांनी व्यक्त केले होते.