Newasa: मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची वाढती पाण्याची गरज आणि तीव्र होत चाललेली उष्णता लक्षात घेऊन मुळा उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन बुधवार (दि. २९ एप्रिल) पासून सुरू करण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ही माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली. उन्हाच्या तीव्रतेमुळे लाभक्षेत्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतकऱ्यांकडून आवर्तन सोडण्याची मागणी वाढली होती. या पार्श्वभूमीवर आमदार लंघे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आवर्तन सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आवर्तनाचा लाभ राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांतील मुळा उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांना होणार आहे. आवर्तनाच्या काळात पाण्याचा अपव्यय टाळावा तसेच शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल, यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण – नेवासा तालुक्यात पाण्याची टंचाई भासू देणार नाही, अशी ग्वाही यापूर्वीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. त्यानुसार आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आवर्तनाची मागणी करताच तात्काळ आदेश देण्यात आले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.