लाहोर – सुरक्षेचे कारण पुढे करून न्यूझीलंडने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली असली, तरी त्यांच्या या कृत्यामागे षडयंत्र आहे, असा धक्कादायक दावा पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी केला आहे.
रावळपिंडी स्टेडियमवर या दोन संघांत शुक्रवारी होणारा पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना न्यूझीलंडने मालिकेतून माघार घेतली. शनिवारी न्यूझीलंडचे खेळाडू मायदेशी परतले. परंतु पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह तेथील अनेक माजी खेळाडू आणि राजकीय व्यक्तींनी न्यूझीलंडच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. न्यूझीलंडसारख्या शांत व संयमी स्वभावाच्या संघाकडून ही अपेक्षा नव्हती, असेही रशीद यांनी म्हटले केले.
न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये कोणताही धोका नव्हता. आम्ही त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. तरीही त्यांनी का माघार घेतली, हे अनाकलनीय आहे. यामागे नक्कीच काहीतरी षड्यंत्र असावे, असे रशीद यांनी सांगितले. न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळवण्यात येणार होते. न्यूझीलंडने दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्नही संपुष्टात आले असल्याने पाक मंडळाच्या अस्तित्वालाही तडा गेला आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने न्यूझीलंडच्या निर्णयावर टीका करताना आम्ही फुलप्रुफ सुरक्षा व्यवस्था ठेवली होती असे सांगितले. मात्र, यावेळी त्यांनी फुल या शब्दाचे स्पेलिंग चुकवले. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मिडीयावर प्रचंड टीका होत असून फुल म्हणजे मूर्ख म्हणायचे की संपूर्ण संबेधायचे असा सवालही पाक मंडळाला चाहत्यांनी केला आहे.