मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयकानुसार दंडाच्या रकमेत वाढ
नवी दिल्ली : देशात वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना 1 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे 500 रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे. परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड 500 रुपयांवरून 5 हजार रुपये केला गेला आहे. मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवल्यास आता 400 रुपयांऐवजी 2 हजार रुपये दंड आकारला जाईल. कायमस्वरूपी चालक परवाना मिळवण्याची प्रक्रियाही अधिक कडक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.