नवी दिल्ली – रस्त्यावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरामध्ये १ सप्टेंबरपासून नवीन मोटार व्हेईकल कायदा लागू केला आहे. यानुसार एका १५ हजार रुपयांच्या स्कुटीचे २३ हजारांचे चलन आणि एका रिक्षाचे ४६,५०० रुपयांचे चलन कापण्यात आल्याच्या बातम्या सध्या व्हायरल होत आहेत. अशातच नवीन मोटार व्हेईकल कायदा पोलिसांनाच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. दिल्लीच्या जॉईंट कमिशनर मीनू चौधरी यांनी मोठा आदेश जारी केला आहे.
मीनू चौधरी यांनी दिलेल्या आदेशानुसार, कोणताही पोलीस कर्मचाऱ्याने ड्युटीदरम्यान आपल्या वैयक्तिक वाहनाद्वारे वाहतूक नियमनाचे उल्लंघन केल्यास त्याच्याकडून दुप्पट दंड आकाराला जाईल. या निर्णयाची प्रत सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्यात आली आहे. या आदेशानंतर पोलिस चांगलेच नाराज झाले आहेत. अनेक पोलिसांचे म्हणणे आहे कि, आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीचे नियम कसे पाळले जाऊ शकतात? वाहतुकीचे नियम पूर्णपणे पाळण्याचा आमचा प्रयत्न असतो. परंतु काहीवेळा आपत्कालीन स्थितीत नियमांचे पालन करणे व्यावहारिक नसते, अशा प्रतिक्रिया पोलिसांमधून उमटत आहे.
दरम्यान, वाहतुकीचे नियम मोडताना अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशावेळेस केवळ सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे का? असा सवाल केला जात आहे.