नगर -तब्बल पाच महिन्यानंतर पूर्णवेळ पोलीस अधीक्षक म्हणून अखिलेशकुमार सिंह यांची वर्णी लागली आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडून त्यांनी आज सायंकाळी पदभार स्वीकारला. यावेळी जिल्ह्याचा आढावा त्यांनी घेतला.
तत्कालीन पोलीस अधीक्षक इशू सिंधू उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक पद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता. पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नगर जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. त्यांनी अकोले येथे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर यवतमाळ, बीड, धुळे येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाळू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. कमी मनुष्यबळामध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नवीन पोलीस ठाणे मंजूर करून आणणे, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. सध्या करोनामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आवाहन त्यांच्यापुढे असणार आहे.
आपल्या मर्जीतला पोलीस अधीक्षक असावा, यासाठी अनेक राजकारण्यांनी प्रयत्न केले होते. अखेर पाच महिन्यांनंतर मुंबई शहर येथील परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अखिलेशकुमार यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी वर्णी लागली.