महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर गेल्या दोन तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते हे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे पाहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांत विविध माध्यमांतून आलेल्या बातम्यांवर नजर टाकली असता असे लक्षात येते की राज ठाकरे आपल्या पक्षाच्या भूमिकेत मूलभूत बदल करण्याची शक्यता आहे. कारण मनसेची ओळख असलेला पक्षाचा पंचरंगी ध्वज आता भगवा होणार आहे अशा बातम्याही येत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईत एक तासापेक्षा जास्त काळ गुप्त चर्चा झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवी मैत्री आणि नवी राजकीय युती आकारास आली तर आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे महायुती म्हणून लढवली होती; पण विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षा जागृत झाल्याने मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेवरून या दोन पक्षांमध्ये मतभेद झाले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला बाजूला सारून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी युती करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेना हा दीर्घकाळ भाजपाचा प्रमुख सहकारी पक्ष होता तोच भाजपपासून बाजूला गेल्याने राज्याच्या राजकारणामध्ये विशेषतः महायुतीमध्ये एक राजकीय स्पेस तयार झाली आहे. ही स्पेस भरण्याचे काम राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे होते की काय अशी शंका घेण्यास वाव आहे. खरेतर एकेकाळी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रचंड प्रशंसक असणारे राज ठाकरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये भाजपवर आणि मोदी यांच्यावर तुफान टीका केली होती.
लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नसताना राज ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी सभा घेऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. पण मोदी-शहा यांना लक्ष्य करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मात्र संयम बाळगला होता. हा इतिहास पाहता आगामी कालावधीमध्ये राज ठाकरे आणि भाजप एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांच्यावर जरी टीका केली असली तरी ज्या राज्यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर सतत टीका करणारे उद्धव ठाकरे याच पक्षांसोबत सत्तेसाठी एकत्र येतात त्या राज्यामध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळे विद्यमान राजकारणाची गरज म्हणून भाजप आणि मनसे एकत्र आले तर राज्यातील राजकारण अधिकच चुरशीचे आणि मनोरंजक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज ठाकरे यांनाही आता आपला पक्ष वाढवण्याची गरज आहे. खरेतर पंधरा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने सुरुवातीला खूपच चांगली कामगिरी केली होती. पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे तेरा आमदार निवडून आले होते. पण नंतरच्या कालावधीमध्ये राज ठाकरे यांचे पक्ष संघटनेकडे झालेले दुर्लक्ष आणि धोरणातील सतत होणारे बदल यामुळे पक्षाला कोणत्याच निवडणुकीमध्ये फारसे यश मिळाले नाही. 2014 मध्ये राज ठाकरे नरेंद्र मोदी यांच्या प्रेमात असल्यामुळे त्यांनी तेव्हाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्येही मनसेला फारसे यश मिळाले नव्हते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्येही मनसेचा एकच आमदार विधानसभेत निवडून गेला आहे. राज्यातील नाशिक, पुणे, ठाणे या महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांमध्ये मनसेचे अनेक नगरसेवक निवडून आले होते.
नाशिकमध्ये तर मनसेची महापालिकेत सत्ता होती; पण राजकीय यशाचा हा आलेख सतत घसरत गेला. साहजिकच आगामी राजकारणाचा विचार करता निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी राज ठाकरे यांनी भाजपला साथ देण्याचा विचार केल्यास आश्चर्य वाटायला नको. शिवसेनेसारखा मोठा सहकारी पक्ष साथ सोडून निघून गेला असल्यामुळे भाजपाला राज्यात एका प्रभावशाली मित्राची गरज आहे. त्यामुळे मनसेने जर मैत्रीचा हात पुढे केला तर भाजप तो हात घट्ट पकडेल अशी शक्यता आहे. 23 जानेवारी रोजी पुण्यामध्ये मनसेचे महाअधिवेशन होणार आहे. या महाअधिवेशनामध्ये राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून मनसेचे कधीही महाअधिवेशन झाले नव्हते. त्यामुळे या पहिल्याच महाअधिवेशनामध्ये राज ठाकरे यांच्या मनात काय आहे हे समजेल असे संकेत मिळत आहेत.
राज ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने मोदी आणि अमित शहा यांच्यावर केलेली टीका विसरून भाजप राज ठाकरे यांची मैत्री स्वीकारेल असे वाटते. शिवसेनेने दुर्लक्ष केलेली मराठी माणसाची अस्मिता आणि हिंदुत्व हे दोन विषय राज ठाकरे आपल्याकडे ओढून घेतील तसेच दिसते. भाजपाला पूर्वीपासूनच राज ठाकरे यांच्याबाबत प्रेम होते; पण उद्धव ठाकरे त्यावेळी त्यांचे मित्र असल्यामुळे राज ठाकरे यांच्याबाबतचे प्रेम भाजपकडून स्पष्टपणे व्यक्त करता येत नव्हते. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी सतत राज ठाकरे यांच्या संपर्कात होते.
राज ठाकरेही गडकरी यांचे सतत कौतुक करीत असत. या गोष्टी लक्षात घेता आता मात्र राज ठाकरे यांनी भाजपशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला तर भाजपला एक मोठा पर्याय उपलब्ध होईल. शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी मैत्री केल्याने राज ठाकरे यांना आता या दोन पक्षांपासून दूरच जावे लागणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकते हे गेल्या काही दिवसांतील घडामोडींनी सिद्ध झाले असल्याने भाजप आणि मनसे एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको. राज ठाकरे यांच्या मनात काय आहे हे लवकरच कळेल. मनात मात्र राज यांच्याशी मैत्री करण्याचा विचार आहे हे नक्की.