दुधेबावी – पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या गोखळी येथील रुपेश भागवत यांचा गोपाळवाडी येथील सोनाली होले यांच्या नुकताच सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. भागवत यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करुन समाजाला एक नवा संदेश दिला आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सध्याच्या युगात वाढदिवसासारख्या किरकोळ गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मग लग्नसमारंभाची गोष्टच वेगळी. केवळ कार्यालयांसाठी लाख-लाख रुपये कदाचित त्याहूनही अधिक भाडे दिले जाते. फटाके, जेवण यासह इतरही गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत रुपेश भागवत यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपला आहे. महापुरुषांनी घालून दिलेली शिकवण जपत रुपेश यांनी अनाठायी खर्चाला फाटा देत लग्नासाठी सत्यशोधक पद्धतीचा अवलंब करत सध्याच्या तरुणांपुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे रुपेश आणि सोनाली यांच्या आईवडिलांसह कुटुंबियांनी या विवाहाला मान्यता दिली. विवाहासाठी हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती.
प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी या सत्यशोधक विवाहाविषयी समाज प्रबोधनपर माहिती दिली. महात्मा फुले यांनी 1873 साली जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मराठा समाजाच्या तरुणाचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला होता. महात्मा फुले यांचे एकपात्री नाटक सादरकर्ते कुमार आहेर यांनी सत्यशोधक प्रार्थना म्हणून विवाहाला सुरुवात केली तर दत्तात्रय जगताप यांनी पौराहित्य केले. ज्येष्ठ नेते बबन लव्हे यांनी पहिली मंगलाष्टक गायिली. विवाहास राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.