महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि शिंदे सरकार स्थापन झाले. त्यानंतर नवनिर्वाचित सरकारने आरे काडशेडबाबतचा महत्वाचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा मोठा एक धक्का होता.
आता शिंदे सरकार पुन्हा एकदा आपल्या विरोधकांना धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे दिलेली १२ आमदारांची यादी अद्याप राज्यपालांनी मंजूर केलेली नाही. त्यामुळे नवीन सरकार आपल्या सरकारमधील उमेदवारांची यादी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवू शकते.
एकनाथ शिंदे सरकार १२ आमदारांची नवीन यादी राज्यपालांना सुपूर्त करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात १२ आमदारांच्या मान्यतेवरून चांगलाच संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे नवीन सरकार पुन्हा नवीन यादी राज्यपालांकडे देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीतील नावे ही त्या त्या क्षेत्रातील नसल्याने राज्यपालांनी यादी अडवून ठेवली होती. यामुळे आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी राज्यपालांवर टीका देखील केली होती. यामुळे राज्यपाल आणि सत्ताधारी यांच्यातला संघर्ष पाहायला मिळाला होता.