रणजी स्पर्धेत तरुवर कोहलीचे त्रिशतक
पुदुच्चेरी – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार एकामागून एक विक्रम रचत असताना आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला असताना, मिझोराममध्ये आणखी एका “नव्या कोहली’चा जन्म झाला आहे. या “नव्या कोहली’ने अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात तडाखेबाज त्रिशतक झळकावून देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
रणजी स्पर्धेतील प्लेट ग्रुपमध्ये मिझोरामविरुद्ध अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात तरुवर कोहलीच्या नाबाद त्रिशतकाच्या (ना. 307) जोरावर मिझोरामने अरुणाचल विरुद्ध मोठी आघाडी घेतली. तरुवरने 408 चेंडूंत 26 चौकारांच्या मदतीने नाबाद 307 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा कोहली हा नववा भारतीय खेळाडू ठरला आहे. कोहलीसह मिझोरामच्या लालहर एजेलाने 124 आणि कर्णधार के. बी. पवन याने 102 धावांची शतकी खेळी केली.
अरुणाचल प्रदेशने पहिल्या डावात 343 धावा केल्या होत्या. उत्तरादाखल मिझोरामने पहिल्या डावात 9 बाद 620 धावांवर डाव घोषित केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अरुणाचल प्रदेशने 3 बाद 143 धावा केल्या होत्या. डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप 134 धावांची गरज आहे.
अरुणाचल प्रदेशने राहुल दलालच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 343 धावा केल्या होत्या. राहुलने 179 चेंडूत 178 धावा केल्या. यात 21 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
असा आहे “नवा कोहली…’
पंजाबच्या जालंधरमध्ये जन्मलेला 31 वर्षीय तरुवर कोहली उजव्या हाताने फलंदाजी करतो. त्याचे वडील जलतरणपटू आणि वॉटर पोलो खेळाडू आहेत. कोहलीने याआधी 2012-13 च्या रणजी स्पर्धेत झारखंडच्या विरुद्ध सेमीफायनलमध्ये त्रिशतक झळकावले होते. फलंदाजीसोबत कोहली जलद गोलंदाजी देखील करतो. 2018-19 च्या विजय हजारे स्पर्धेत कोहलीने मिझोरामकडून सर्वाधिक धावा आणि विकेट घेतल्या होत्या. सात सामन्यात 373 धावा आणि आठ विकेट अशी त्याची कामगिरी होती.